काश्मीरमध्ये पर्यटकांना परत आणण्यासाठी प्रयत्न करणार   

श्रीनगर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांची संख्या कमी झाल्याने काश्मीरमध्ये पर्यटकांना परत आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी गुरुवारी सांगितले. 
 
भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्व थांबल्यानंतर पुन्हा सुरू झालेल्या श्रीनगर विमानतळाच्या कामकाजाचा नायडू यांनी आढावा घेतला. त्यानंतर पोलो व्ह्यू बाजारपेठेत त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, पहलगाम हल्ल्यामुळे येथील पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे स्थानिक व्यावसायिक चिंतेत आहेत. येथे पर्यटकांना परत आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल.  
 
गेल्या पाच वर्षांत काश्मीरमध्ये पर्यटनात तेजी आली आहे, याचा अंदाज श्रीनगर विमानतळावरील विमान फेर्‍यांवरून येऊ शकतो. २०१९ मध्ये विमानतळावर येणार्‍या प्रवाशांची संख्या २५ लाख होती, २०२४ मध्ये ती ४५ लाख झाली. पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून आवश्यक असलेली सर्व मदत आम्ही देऊ.
 

Related Articles